| |
  |
साईबाबांचे मुळ नांव, त्यांचे आई वडील या विषयी कोणालाही माहिती नाही. त्यांचा कालावधी अंदाजे १८३८ ते १९१८ असा मानतात. बाबा कोणाचे आवतार आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. राम-कृष्ण-हनुमान-शंकर-गणपती-गुरु दत्तात्रेय, स्वामी समर्थ, माणिकप्रभू इ. संबंध श्री साईबाबांच्या अवताराविषयी पोचतो. साईबाबांची धुनी, उदी, त्यांचा हिंदु-मुसलमान भक्त परिवार, त्यांचे एकत्रितपणे वागणे, गोरगरीबांविषयी करुणा, हे ध्यानात घेता त्यांना दत्तावतारात स्थान देण्यात आले आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे अनेकांना मान्य आहे.
साईबाबांचा जीवनक्रम प्रारंभ थोडक्यात असा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील धूप नावाच्या गावालगतच्या जंगलात चांदभाई नावाचा व्यापारी आपली घोडी शोधत होता. फकीर वेषातील बाबांनी त्याची घोडी शोधून दिली. चांदभाईंनी चिलिम ओढण्यास दिल्यावर जमिनीवर चिमटा आपटून निखारे निर्माण केल्यावर फकीराच्या दैवी शक्तीचा अनुभव झाला. चांदभाईंनी त्यांना घरी नेले. पुढे चांदभाईंच्या घरी लग्न कार्य झाले. त्यांचे वऱ्हाड शिरडीस येणार होते. त्या वर्हाडाबरोबर हा तरुण फकीर शिरडीत आला. प्रथम खंडोबाच्या देवळात गेला. तेथे वडाच्या झाडाखाली चिलिम फुंकत बसले असता देवळाचे मालक म्हाळसापती सोनार तेथे आले. त्यांनी फकीरास पाहून ।।आवो साई।। असे म्हटले. तेव्हापासून फकीर साईबाबा म्हणून ओळखू लागले.
म्हाळसापत बरोबर श्री साईबाबा शिरडीस राहू लागले. तेथे त्यांचे काशिराम शिंपी, आप्पा जागले हे शिष्य बनले. ज्या निंबाच्या झाडाखाली बसून बाबा लोकांशी चर्चा करीत त्याच्याखाली आपल्या गुरुंच्या पादुका आहेत असे आढळून आले. एका पडीक जागेत बाबांनी फुलबाग तयार केली. बाबांचे वागणे- बोलणे वरवर पाहता वेड्यासारखे होते. हातात पत्र्याचे टमरेल, मळकट कापडाची झोळी, अंगावर एखादी कफनी अशा वेशात बाबा भिक्षा मागत. खाण्या पिण्याची शुद्ध त्यांना नव्हती. काही दिवसांनी ते पडक्या मशिदीत राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने हीच जागा पुढे ।। व्दारकामाई।। म्हणून प्रसिद्ध झाली. राम नामाचा जप सुरु झाला. अक्षय जागृत असणारी धुनी तयार झाली. हजारो, लाखो भक्तांना उदी भस्म मिळत राहीले.
बाबांनी अनेक चमत्कार केले. दुकानदारांनी तेल दिले नाही म्हणून त्यांनी पाण्याच्या पणत्या पेटविल्या, अनेकांची शारिरीक व्याधी दूर केली, पिशाच्च बाधा दूर केली. बाबांच्या अंगठ्यातून गंगा यमुनांच्या धारा वहात असतानाही साक्ष दासगणूंची आहे. योगविद्येतही बाबा तत्पर होते. शिरडी बाबांच्या वास्तव्याने तिर्थक्षेत्र बनली.
बाबा म्हणत - कधीही न मिळणारा हा मनुष्यजन्म विषय भोगाच्या नादाने फुकट घालवू नका. तुम्हांला समजणार नाही ते मला विचारा, तुमच्या सेवेसाठी परमेश्वराने येथे मला पाठविले आहे. तुमच्यासाठी माझा जीव तळमळत आहे. तुमचा उद्धार करणे हे या अल्लाच्या सेवकाचे पहिले कर्तव्य आहे. या जगात अमर कोणीही नाही. प्रत्येकाला एक दिवस मरावयाचे आहे. मरणाचे भूत नित्य डोळ्यासमोर ठेवा म्हणजे त्या भितीने तरी तुम्हाला परमेश्वराची आठवण होईल. मनातील अहंकार सोडून डोळ्यासमोर आपल्याला आवडेल त्या देवाची अटळ विश्वासाने आराधना करा असे बाबा सांगत.
श्री बाबांनी कधी कनवाळूपणे, कधी रागावून-लोभावून, नीट समजूत काढून लाखो लोकांची पीडा दूर केली. कसल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता ते अन्नदान करीत. असा हा अवतारी पुरुष १५ ऑक्टोबर १९१८ या दिवशी समाधिस्त झाले.
|
|